मुंबई या महानगरीचं नाव ज्या देवीवरून पडलं ती मुंबादेवी म्हणजे मुंबापुरीचं ग्रामदैवत. या देवीबद्दल ब-याच आख्यायिका सांगितल्या जातात. मुंबईतल्या कोळी बांधवांची ही देवी असून त्यांनीच तिची स्थापना केल्याचा इतिहास आहे. पूर्वीचे व्हिटी किंवा बोरीबंदर रेल्वेस्थानक म्हणजे आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटावर कोळी बांधवांनी या देवीची स्थापना केली होती. मात्र, रेल्वेस्थानकाची भव्य इमारत बांधण्यास सुरुवात झाल्याने तेव्हाच्या ब्रिटिश गव्हर्नरनं या मूर्तीची प्रतिष्ठापना अन्यत्र करण्याची विनंती केली. तेव्हा काही काळ ही मूर्ती आजच्या मेट्रो सिनेमाजवळील धोबीतलाव परिसरात होती व नंतर सध्याचं भुलेश्वरमधलं मंदिर उभारलं गेल्याचं स्थानिक सांगतात. हे मंदिरही किमान दोनशे वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं.
पौराणिक ग्रंथांनुसार मुंबादेवीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळं मुंबईला लक्ष्मीचं शहरही म्हटलं जातं. मुंबा देवी ही मुंबईची ग्रामदेवी असल्यानं मुंबईत राहणारे लोक शुभकार्य करताना तिचं स्मरण करतात. मुंबादेवी, समुद्रात येणा-या संकटांपासून संरक्षण करते, अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबा देवी मंदिर न्यासाची स्थापना करण्यात आली. आजही हा न्यासच मंदिराची देखभाल करतो. देवीचं मंदिर खूपच आकर्षक आहे. मातेची मूर्तीही खूपच आकर्षक आहे. मूर्ती नारंगी चेह-याची असून चांदीच्या मुकुटाने सुशोभित आहे. आगरी आणि कोळी बांधवांची देवीवर अपार श्रद्धा आहे. आता हे मंदिर कपडा बाजार, स्टील बाजार आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांनी वेढलं आहे. तिथं रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ही भरभराट देवीमुळंच असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. मुंबादेवीच्या शेजारीच मोरावर आरूढ झालेली अन्नपूर्णाही आहे. लक्ष्मी आणि अन्नपूर्णा म्हणजे जगण्याचाच मूळ आधार असल्यानं सा-या मुंबापुरीची भिस्त या आदिमाया, आदिशक्तीवर आहे.
देवीच्या नावाचा आता रस्ताही आहे आणि चौकही. त्यासाठी स्थानिकांनी दीर्घकाळ आग्रह धरला होता. या देवीवर केवळ स्थानिकांचीच नव्हे तर, बाहेरून उपजीविका करण्यासाठी या शहरात येणारेही या देवीवर श्रद्धा ठेवतात.







