कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील मार्बल आता काढले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबतचा निर्णय नुकताच घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यासंदर्भातील निविदा काढली आहे. मंदिरातील तापमान या मार्बलमुळेच वाढत असल्याचे उघड झाले आहे. पुरातत्त्व विभाग आणि ऐतिहासिक वारसा क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. अंबाबाई मंदिरातील मार्बल काढल्याने आता मंदिराला पुन्हा ऐतिहासिक रुप मिळेल.
सध्याच्या संगमरवरी फरशीखाली पूर्वीची दगडी फरशी आहे. हे काम १९७० ते १९७५ या कालावधीत झाल्याची सांगितले जाते. हे मार्बल काढणे जिकीरीचे आहे. ते काळजीपूर्वक काढावे लागणार आहे. त्याखाली असलेल्या मूळ रचनेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हातोडी आणि छन्नीचा वापर करावा लागणार आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काढलेल्या निविदेत तसा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.
मंदिरातील आर्द्रता कमी करण्यासाठी मुळची दगडी रचना उपयुक्त आहे, असे संबंधित तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मार्बल काढण्याबरोबरच वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी मेघडंबरी आणि दारांच्या आतील भाग ऑइल पेंटमुक्त केला जाणार असून त्याऐवजी दरवाजाला चांदीचे आच्छादन वापरले जाणार आहे.
दरम्यान, मंदिराच्या मूळ इमारतीवर एक हजार टनाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. तो लवकरात लवकर उतरुन घेण्याची गरज आहे. त्यामुळे मंदिरातील मोठी झुंबरे आणि त्यासाठी लावलेले लोखंडी रॉडही काढून घेतले जाणार आहेत.







