नवी दिल्ली : जगप्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज (८३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दिल्लीतील साकेत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

पंडित बिरजू महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावरून दिली. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौ येथे झाला होता. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. कथ्थक नर्तनासोबतच ते शास्त्रीय गायकही होते.
बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेसुद्धा प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.

महाराष्ट्राप्रती प्रेम
बिरजू महाराज यांच्याबद्दल तमाम मराठी जनतेला आदर होता. जळगावपासून पुण्यापर्यंत आणि मिरज-सांगलीपासून औरंगाबादपर्यंत, मुंबईपासून अमरावतीपर्यंत विविध ठिकाणी होणाऱ्या संगीत महोत्सवात ते सातत्याने येत असल्याने त्यांचा अनेकांशी व्यक्तिगत स्नेहही होता.
‘‘मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो. कारण माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली; पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिले.” असे त्यांनी म्हटले होते.
झळाळती कारकिर्द
बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. 2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2016 मध्ये, बाजीराव मस्तानीच्या ‘मोहे रंग दो लाल’साठी त्यांना नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

बिरजू महाराज यांनी वयाच्या 13 व्या वर्षी नवी दिल्लीतील संगीत भारती येथे नृत्य शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील भारतीय कला केंद्रातही शिक्षण देणे सुरु केले. काही काळानंतर त्यांनी कथ्थक केंद्रात (संगीत नाटक अकादमीचे एक युनिट) शिकवण्याचे काम सुरू केले. येथे ते प्राध्यापक आणि संचालकही होते. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी तेथून निवृत्ती घेतली. यानंतर दिल्लीतच कलाश्रम नावाने थिएटर स्कूल सुरू केले.

पंतप्रधानांची श्रद्धांजली
कथक नृत्यशैलीचे महान नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बिरजू महाराज यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान म्हणतात,
“भारतीय नृत्यकलेला साऱ्या जगात विशेष ओळख मिळवून देणारे आदरणीय पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने अतिशय दुःख होत आहे. त्यांचे देहावसान ही संपूर्ण कलाजगतासाठी कदापि भरून न येणारी हानी आहे. या शोकप्रद प्रसंगी त्यांचे आप्तस्वकीय आणि त्यांचे प्रशंसक यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांतिः ।”







