पुणे : मराठी प्रकाशन विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्व अरुण जाखडे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. विचारप्रवण, संशोधन, विवेकवादी साहित्य निर्मितीसाठी त्यांनी कायम आग्रह धरला. त्यातूनच त्यांच्या पद्मगंधा या प्रकाशन संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रासह देशातही वाढला.

जाखडे यांचे गाव अतिशय लहान आणि खेडे होते. गावात पोस्टमन, शाळा, दवाखाना, एस.टी. वगैरे वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे त्यांचे बालपणच नव्हे तर वयाची २० वर्षे रानावनांत भटकण्यात, निसर्गाच्या सान्निध्यात गेली. हायस्कूलसाठी थोड्याशा मोठ्या गावात ते गेले. बोर्डिगमध्ये राहिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले.

नगरमध्ये बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी काही काळ ‘कायनेटिक इंजिनिरिंग’मध्ये नोकरी केली. तिथून ‘ड्रिल्को मेटल कार्बाईड’मध्ये आले. मेटलर्जीच्या परीक्षा देणे शक्य व्हावे म्हणून ‘ड्रिल्को’ सोडून ते 1982 मध्ये ते पुण्याला ‘बजाज टेम्पो’त दाखल झाले. कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी जाखडे यांनी 1988 मध्ये ‘पद्मगंधा’चा पहिला दिवाळी अंक काढला. त्यानंतर त्यांनी साहित्यक्षेत्रात दमदार वाटचाल केली.

मराठी साहित्यात डॉ. रा. चिं. ढेरे, लावणी वाड्मय, श्री. व्यं. केतकर, र. धों. कर्वे, अगाथा ख्रिस्ती, भाषा प्रकल्प आणि नंतर अल्बेर कामूच्या साहित्यावर त्यांनी विशेष काम केले. ते स्वतःही उत्तम लिहित. त्यांची पाचरूट ही कादंबरी, एक काडी गवताची हा कथासंग्रह, इर्जिक हा ललित लेखसंग्रह, गावमोहर ही मुलांसाठीची कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांनी बालवाड्मय, विज्ञान, इतिहास अशा विषयांवर विपुल लेखन केले. त्यांना राज्यशासन, महाराष्ट्र फाउंडेशनसह विविध पुरस्कार मिळाले.







