डकार (सेनेगल) : लोकशाहीत राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकमेकांप्रती आदर असणे आवश्यक आहे, वादविवाद, चर्चा आणि संवाद हे संसदीय कार्यपद्धतीचे मूलमंत्र आहेत, यावर उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी भर दिला.
गॅबॉन, सेनेगल आणि कतार या तीन देशांच्या दौ-यावर असलेल्या नायडू यांनी शुक्रवारी सेनेगलची राजधानी डकार इथे सेनेगलच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष मुस्तफा नियासे यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरावर संवाद साधला.
जागतिक स्तरावर शांतता निर्माण करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी कार्य करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. प्रगतीसाठी शांतता ही पूर्वअट असल्याचे सांगून जगातील सर्व समस्यांवर शांततापूर्ण पद्धतीने तोडगा निघू शकतो अशी भारताची भूमिका असल्याचे नायडू यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत आणि आफ्रिकेतील सर्वात स्थिर आणि आदर्श लोकशाही असलेला सेनेगल ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांची नैसर्गिक भागीदार आहेत आणि त्यांच्यात नैसर्गिक आत्मीयता आहे, असे त्यांनी सांगितले. सेनेगलने आपल्या निर्मितीपासून अध्यक्षीय, संसदीय आणि स्थानिक निवडणुका अत्यंत शांततेत , मुक्त, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने घेतल्याबद्दल नायडू यांनी त्यांचे कौतुक केले. भारताप्रमाणेच, राजकीय स्थैर्य, आर्थिक वाढ, सामाजिक एकता आणि आंतरराष्ट्रीय समुदायात महत्त्वाची भूमिका बजावणारी लोकशाही ही सेनेगलची बलस्थानं आहेत ,” असे ते म्हणाले.