तुळजापूर : आई राजा उदं उदं, सदानंदीचा येळकोट येळकोट असा गजर जिथं वर्षभर सुरू असतो ते अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि उभ्या महाराष्ट्राचं हे श्रद्धास्थान. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे तीर्थक्षेत्र देवीच्या महाराष्ट्रातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ते सोलापूर शहरापासूनही ४५ किलोमीटरवर असल्याने दोन्ही मार्गांनं तिथं जाता येतं. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा राज्यातील भाविकांचाही इथं वर्षभर राबता असतो.
समुद्रसपाटीपासून २६०० फुट उंचीवर असलेलं भवानी मातेचं मंदीर बालाघाट डोंगराच्या कडेपठारावर वसलं आहे. या डोंगराचं पुराण ग्रंथातील जुनं नाव यमुनागिरी असं होतं. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडं असल्यामुळं त्याचं नामकरण चिंचपूर झालं. नंतर तुळजाभवानीच्या नावानं लोक तुळजापूर म्हणू लागले.
तिनं दैत्याशी युद्ध केलं. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देवीने त्रिशुळाने त्याचं शीर वेगळं केलं. म्हणून तिला महिषासूरमर्दिनीही म्हणतात. भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळं तिला त्वरिता असं नाव पडलं. कालांतरानं त्वरिताचं-तुरजा आणि पुढं तुळजा झालं. निजामशाही असो किंवा आदीलशाही, छत्रपतींचं स्वराज्य असो की स्वातंत्र्यानंतरचं लोकशाही सरकार असो देवीची पूजा अर्चना, विधींमध्ये बदल झालेले नाहीत.
महाद्वारातून आत गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ लागते. त्यानंतर गोमुख लागते. तिथं अखंड जलप्रवाह वाहतो. मग मंदिराचा कळस दिसतो.
गाभाऱ्यात चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिनं विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे. तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. उजव्या पायाखाली महिषासूर तर, तर डाव्या बाजूला सिंह आणि मार्कंडेय ऋषींची मूर्ती दिसते. उजव्या खांद्याजवळ चंद्र तर डाव्या खांद्याजवळ सूर्य आहे.
नवरात्रोत्सवात देवीची विविध रूपांत पूजा होते. ही चल मूर्ती असून वर्षातून तीन वेळा निद्रा घेते. देवीच्या आशीर्वादानं शिवाजीराजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती. त्याची आठवण ठेऊन नवरात्रात एक दिवस भवानी तलवारीच्या रूपात देवी दिसते.







