नाशिक : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मोठी मोहीम सुरू आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीनेही विविध पुरावे देऊन सरकारकडे अहवाल सुपूर्द केला आहे. मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवाव्यात, असा उपक्रम साहित्य संमेलनात राबविला जात आहे. याठिकाणी राष्ट्रपतींचा पत्ता असलेली अनेक पोस्टकार्डे उपलब्ध असून ती आपण लिहून तिथेच असलेल्या पोस्ट पेटीत टाकावीत, ती राष्ट्रपतींना पाठविली जातील, असे संयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.







